मुंबई : ‘माझी कुलगुरुपदी निवड झाली म्हणून मी कोणंतही सेलिब्रेशन करणार नाही. तर थेट कामाला सुरुवात करणार. त्यामुळे माझी अशी विनंती आहे की, कुणीही पुष्पगुच्छ घेऊन मला भेटायला येऊ नये. पण तुमच्या काही सुचना असतील तर त्या घेऊन नक्की या.’ असं मुंबई विद्यापीठाचे  नवनिर्वाचित कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.


राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली. राज्यपालांनी आज (27 एप्रिल) राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्त पत्र सोपवलं.

‘मी थेट कृतीवर विश्वास ठेवणारा, कोणतंही दडपण नाही’

‘मी थेट कृतीवर विश्वास ठेवणारा आहे. त्यामुळे माझ्यावर कोणतंही दडपण नाही. पण माझ्यासमोर अनेक आव्हानं आहेत. परीक्षांचे निकाल वेळेवर लावणं ही माझी प्राथमिकता आहे. ते एक महत्त्वाचं आव्हान आहे.’ असंही कुलगुरु यावेळी म्हणाले.

‘मुंबई विद्यापीठाला मोठी परंपरा’

‘मुंबई विद्यापीठाला एक मोठी परंपरा आहे. त्यामुळे सर्व लोकांना सोबत घेऊन काम करायचं आहे आणि ही परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, मी सर्वांना सोबत घेऊन काम करु शकेल.’ असा विश्वास कुलगुरुंनी व्यक्त केला.

‘सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन सहकार्य करावं’

‘गेल्या अनेक दिवसांपासून कुलगुरुपद रिक्त होतं. मला वाटतं की, सर्वजणच वाट पाहत होते की, कुणीतरी चार्ज घ्यावा. ज्याला विद्यापीठाची माहिती आहे अशा व्यक्तीची नेमणूक व्हावी. त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन विद्यापीठाची परंपरा पुढे नेण्यासाठी काम करावं असं मी  आवाहन करतो.’ असं डॉ. पेडणेकर म्हणाले.

‘कुणीही पुष्पगुच्छ घेऊन भेटायला येऊ नका’

‘मला तुमच्या माध्यमातून आणखी एक गोष्ट सांगायची आहे की, कुणीही पुष्पगुच्छ घेऊन मला भेटायला येऊ नये. तुमच्या विद्यापीठासंबंधी काही सुचना असतील तर त्या घेऊन जरुर या.’ असंही यावेळी कुलगुरु म्हणाले.

VIDEO :

संबंधित बातम्या :

डॉ. सुहास पेडणेकर मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरु