मुंबई : एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांनी जीव गमावल्यानंतर सरकार आता खडबडून जागं झालं आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील 8 ते 10 रेल्वे स्टेशनबाबतचा अहवाल तातडीन सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


पियुष गोयल यांची मुंबईतल्या रेल्वे अधिकाऱ्यांशी महत्त्वाची बैठक झाली. सतत गर्दी असणाऱ्या स्टेशनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आणि तातडीने निधी उपलब्ध करुन काम सुरु करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले.

लोअर परेल, महालक्ष्मी आणि कांजुर मार्ग यांसारख्या गर्दीत झपाट्याने वाढ झालेल्या स्टेशनचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. सायन, महालक्ष्मी आणि एल्फिन्स्टन यांसारख्या थेट रस्त्यांना जोडलेल्या एलिव्हेटेड फुटओव्हर ब्रिज असलेल्या स्टेशनवर लवकरात लवकर काम सुरु करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

गोवंडी, भांडुप यांसारख्या स्टेशनांवर बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग आहे. त्यामुळे बाहेर पडताना गर्दीच्या वेळेत प्रवाशांना प्रचंड कसरत करावी लागते. या स्टेशनबाबतीतही अहवाल मागवला आहे. काम झाल्यानंतर बाहेर पडण्याचा मुख्य मार्ग बंद करण्यात आला आणि फुटओव्हर ब्रिज देण्यात आला नाही, अशा जोगेश्वरी सारख्या स्टेशनवरही काम सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईत काही स्टेशन असे आहेत, जिथे बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही. त्यामुळे फाटक ओलांडून प्रवाशांना जावं लागतं. अशा ठिकाणी काय केलं जाऊ शकतं, याबाबतचे पर्याय शोधा आणि दोन आठवड्यात कामाला सुरुवात करा. केंद्र सरकार निधी देईल, असं पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मुंबईतील ही स्टेशन्स मृत्यूचा सापळा!


बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या!


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?


एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?


एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?