मुंबई: मुंबईतील चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना राज्य सरकाने 5 आणि रेल्वेने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून तर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेकडून मदतीची रक्कम जाहीर केली.

याशिवाय गंभीर जखमींना 1 लाख रुपये, किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली.

मुख्यमंत्री सध्या नियोजित सिंगापूर दौऱ्यावर, तर रेल्वेमंत्री मुंबई दौऱ्यावर आहेत.

कोणाला किती मदत?

  • मृतांच्या वारसांना: राज्य सरकारकडून 5 लाख + रेल्वेकडून 5 लाख = 10 लाख

  • गंभीर जखमी:  1 लाख

  • किरकोळ जखमी: 50 हजार

  • जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार


 मुंबईतील सर्वात मोठी रेल्वे दुर्घटना

एल्फिन्स्टन परळ स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत 22 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 39 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये 14 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 18 जणांची ओळख पटलेली आहे.

सकाळी पावसाची एक जोरदार सर येऊन गेली होती. त्यामुळे पायऱ्या निसरड्या झाल्या होत्या. मात्र त्याचवेळी एल्फिन्स्टन आणि परळ दोन्ही स्थानकांवर एकाचवेळी लोकल दाखल झाल्या. त्यामुळे पुलावर गर्दी झाली.

त्यातच पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पूल कोसळत असल्याची अफवा उठली. लोक धावाधाव करु लागले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन 22 जणांचा जीव गेला.

एल्फिन्स्टन आणि परळला जोडणारा पूल कायमच गर्दीचा असतो. त्याची वारंवार रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी तक्रार केली होती. मात्र ही अडचण गांभीर्यानं न घेतल्यानं लोकांना जीव गमवावा लागलाय.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार असून या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री म्हणाले, ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सर्व जखमींना योग्य उपचार तात्काळ मिळवून देण्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/913686843387973632

रेल्वे मंत्र्यांची प्रतिक्रिया

ही घटना अतिशयक दु:ख देणारी आहे. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबईतील फूटओव्हर ब्रिजचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. जिथे फूटओव्हर ब्रिजची रुंदी वाढवण्याची गरज आहे, तिथे तातडीने वाढवू, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले.

संबंधित बातम्या

एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं?


LIVE : मुंबईत एलफिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी


एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू