मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पुलावर  मोठी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला, तर 39 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास फूट ओव्हर ब्रिजवरील पत्रा कोसळल्याची ओरड झाली.


यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. त्यातच ब्रिज पडत असल्याच्या आणि शॉर्ट सर्किट झाल्याच्या अफवा पसरल्या. त्यामुळे ब्रिजवरील प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ माजला.

मुंबईतील सर्वाधिक गर्दीची स्टेशन्स

मुंबईतील रेल्वे स्टेशनांवर अरुंद पूल ही सर्वात मोठी समस्या आहे. या पुलांवर प्रवासी दररोज मृत्यूशी झुंज देऊन प्रवास करत असतात. मुंबईतील महत्त्वाचं दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण, घाटकोपर, डोंबिवली, अंधेरी या गर्दी असणाऱ्या स्टेशनवर मुंबईकर दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात.

  • डोंबिवली : दररोज 2,33,635  प्रवासी प्रवास करतात

  • ठाणे : दररोज 2,25,490 प्रवासी प्रवास करतात

  • कल्याण : दररोज 1,80,676 प्रवासी प्रवास करतात

  • घाटकोपर : दररोज 1,74,926 प्रवासी प्रवास करतात

  • कुर्ला : दररोज 1,50,708 प्रवासी प्रवास करतात


या स्टेशनांवर पुलाचा अभाव

स्टेशनवर दोन ट्रेन एकाच वेळी येतात तेव्हा मोठी गर्दी होते. मुंबईतील कुर्ला, दादर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, घाटकोपर, अंधेरी ही स्टेशन वर्दळीची आहेत. दादर आणि कुर्ला या स्टेशनवर तीनही रेल्वे मार्गांचे प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे दोन ट्रेन एकाच वेळी येतात, तेव्हा फुटओव्हर ब्रिजवर होणारी गर्दी ही जीवघेणी असते.