मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला भगदाड पडले आहे. माहिम विधानसभा मतदारसंघातून चारवेळा आमदार आणि एकवेळा नगरसेवक राहिलेले शिवसेनेचे सुरेश गंभीर, यांच्यासह बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थीतीत सुरेश गंभीर आणि सुनील गणाचार्य यांनी भाजपत प्रवेश केला.


यावेळी पक्षप्रवेशानंतर माजी आमदार गंभीर म्हणाले की, ''पंतप्रधान मोदी जे काम करतात ते तळागाळातील वर्गासाठी आहे. शिवसेनेनं आपल्याला मोठं केलं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत शंका नाही. पण नरेंद्र मोदी मागासवर्गाला न्याय देत आहेत. त्यामुळे सेनेला रामराम करुन भाजपत प्रवेश करत असल्याचे सांगितले.

तर बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊनच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे यावेळी सांगितले.

दरम्यान, आशिष शेलार यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पोस्टरवॉरवरुन शिवसेनेवर पुन्हा तोफ डागली. ते म्हणाले की, ''जे पोस्टर लावलं त्या पक्षाच्या लोकांनी पुरुषार्थाचा परिचय सार्वजनिक रित्या द्यावा, मग मी उत्तर देईन.'' असे यावेळी सांगितले.