मुंबई: माजी महापौर आणि शिवसेने नेत्या शुभा राऊळ यांच्यासह सेनेच्या तीन नगरसेवकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण शिवसेना नगरसेवकाच्या तक्रारीनंतर या तिघांवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.


आचारसंहितेच्या काळात उद्यानांचं उद्घाटन करुन आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शुभा राऊळ, नगरसेविका शितल म्हात्रे, सेनेचे स्विकृत नगरसेवक अवकाश जाधव यांच्यावर बोरिवलीतील एमएचबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शिवसेनेचेच नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी शिवसेनेतील नगरसेवकांविरोधात निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.



काय आहे प्रकरण?

दहिसरच्या एलआयसी कॉलनीत एक खासगी उद्यान पालिकेने ताब्यात घेतलं आहे. या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी माजी महापौर, नगरसेविका शुभा राऊळ, शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव यांचा नगरसेवक निधी, तर आमदार रामदास कदम यांचा आमदार निधी वापरण्यात आला.

कर्मयोग उद्यान नावाने हे सर्वश्रुत आहे. या उद्यानाचं 10 जानेवारीला उद्घाटन झालं.

मात्र आचारसंहिता जारी झाल्यानंतर काही दिवसांनी, म्हणजेच 14 जानेवारीला रोजी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून या परिसरातील सामाजिक संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी कर्मयोग उद्यानात स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला शुभा राऊळ यांच्याबरोबर नगरसेविका शीतल म्हात्रे आणि अवकाश जाधव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.

पण शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा या सर्व प्रकाराला आक्षेप होता.  आचारसंहिता लागू असताना या कार्यक्रमात कर्मयोग उद्यानाचे उद्घाटन करण्यात आलं, असा दावा शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केला होता.

निवडणुका जाहीर झाल्यानंतर उद्यानाचे उद्घाटन झाल्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी घोसाळकर यांनी केली होती.