मुंबई : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळासंदर्भातील एबीपी माझाच्या बातमीनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. विमानतळावरील अनधिकृत एंट्री टोलविरोधात धडक मोर्चा काढत, शिवसैनिकांनी जीव्हीकेचा टोलनाका बंद पाडला.


जीव्हीकेने टोलधाड पुन्हा सुरु केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील. आज विमानतळाच्या बाहेर आंदोलन केलं, उद्या आत घुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिला. तसंच टोल वसुली सुरु केल्यास विमानतळ बंद पाडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शिवसेनेच्या आंदोलनानंतर विमानतळावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
मुंबई विमानतळ परिसरात जर तुम्ही प्रवेश केला तर प्रत्येक फेरीवर एन्ट्री फीच्या नावाखाली 130 रुपये वसूल केले जातात. त्यासाठी तुम्हाला पार्किंग करायचीही गरज नाही. आत शिरताच तुमच्यावर टोलसक्ती लागू होते. मात्र टोल मागणाऱ्याकडे पावती पुस्तकाशिवाय कुठलंच उत्तर नसतं.

नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट
संपूर्ण देशात फक्त इथेच एअरपोर्ट ऑथरिटी आणि सिव्हिल एव्हिएशनचे नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची रोज लाखोंना लूट होते, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विश्वास भांबुरकर यांनी केला आहे.

मुंबई विमानतळावरील एन्ट्री फी दहा दिवसात बंद करा : शिवसेना

आरोपांवर GVKचं म्हणणं काय?
– मुंबई विमानतळ अतिसंवेदनशील आहे. वाहनांच्या गर्दीमुळेच खासगी वगळता इतर वाहनांवर एन्ट्री टोल घेतला जातो.

– एअरपोर्ट ऑथरिटी आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या करारानुसार टोल दर ठरवण्याचे सर्वस्वी अधिकार GVK कडे आहेत

– प्रवाशांसाठी खास इलेव्हटेड रोड बांधला गेला आहे. त्याच्या सेवेसाठी हजारो कर्मचारी असतात. एन्ट्री फीचा पैसा या सर्व देखभालीसाठी दिला जातो.

दरम्यान, 2014 साली एबीपी माझाच्याट बातमीनंतर सर्वपक्षीय आंदोलन होऊन ही टोलधाड बंद झाली होती. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी 20 रुपये वाढीव दरानं ती पुन्हा सुरु झाली.

खरंतर या टोल धाडीतून अनेक बड्या धेंडांची हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे. यात कंत्राटदार आणि कमर्शियल कंपन्यांचं फावतं. मात्र सर्वसामान्यांना ही लूट निमूटपणे सहन करण्याशिवाय पर्यायच उतर नाही.

पाहा व्हिडीओ