मुंबई: 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका राणा दाम्पत्याने (Navneet Rana and Ravi Rana) मागे घेतली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं कारण देत आपण हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा राणा दाम्पत्यांने केली असली तरी आता शिवसेनेने त्यांच्यावर टीका केली आहे. 'बिस्लेरीची अर्धी बाटली अन् राणांची हातभर फाटली' अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या आहेत. 


पंतप्रधान मोदी मुंबई यांच्या दौऱ्याला गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा आमदार रवी राणा यांनी केली आहे. त्यावर शिवसेनेने घोषणाबाजी करत पेठेवाठप केले. 


मुंबईमध्ये येऊन मातोश्रीला आव्हान देण्याची हिंमत कुणाचीही नाही हे अधोरेखित झाल्याचं शिवसेना युवानेते वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. वरुण सरदेसाई म्हणाले की, दोन दिवसांपासून राणा दाम्पत्यांनी त्यांच्या घराबाहेर पाऊल ठेवलं नाही. ही शिवसैनिकांची ताकद आहे, हे महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिलं आहे. 


गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील वातावरण चांगलंच तापलं आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेनेही त्याला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका घेतली होती. त्यावर आज पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याला गालबोट लागू नये म्हणून राणा दाम्पत्याने हनुमान पठणाची भूमिका मागे घेतली. त्यानंतर आता शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली असून पेठे वाटण्याचा कार्यक्रमही सुरू आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: