मुंबई : भाजपमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना पक्षप्रवेश दिला जात आहे. यावरुन मित्रत्वाच्या नावाखाली शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे हे काळं धन जमा करण्यापेक्षाही वाईट आहे, असा टोला शिवसेनेने 'सामना'तून लगावला आहे.


 

या गुंडांचा भाजपमध्ये प्रवेश


विठ्ठल शेलार, पुणे

- 2008 पासून विठ्ठल शेलारवर तब्बल 10 गंभीर गुन्ह्यांची नोंद

- 2010 आणि 2012 मध्ये हत्येचे दोन गुन्हे शेलारवर दाखल

- 14 फेब्रुवारी 2012 रोजी दत्तात्रय तिकोणे, ज्ञानेश्वर कांबळेंचं अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप

 

 पवन पवार, नाशिक

- खून, खंडणी, जमीन बळकावणे अशा गंभीर स्वरुपाच्या 15 गुन्ह्यांची नोंद

- पोलिस हवालदाराचा खून केल्याप्रकरणी पवन पवार मुख्य आरोपी

- नगरसेवक आणि प्रभाग सभापती असताना खंडणीप्रकरणी जेलची हवा

 

पिंटू धावडे, पुणे

- खंडणी, हत्या आणि मारामारी करुन दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हा

- तुरुंगातच कुख्यात बाबा बोडकेसोबत पिंटू धावडेची ओळख

- कनिष्ठ न्यायालयाकडून पिंटू धावडेची मुक्तता

 

श्याम शिंदे, पुणे

पोलिसाला मारहाण करणं, दंगल माजवल्यासह आणखी एका गुन्ह्याची नोंद

20 जूला वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा

37 दिवस येरवडा तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर श्याम शिंदे बाहेर

 

काय लिहिलं आहे 'सामना'?


 

उंचे लोग उंची पसंद!

गुंडांना सत्ताधाऱ्यांची कवचकुंडले हवीच असतात व अशा गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे व पक्षाची व्याप्ती वाढविणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. असे सर्व दाखलेबाज लोक कालपर्यंत राष्ट्रवादीच्या छत्रछायेखाली होते. ते सगळे एका रात्रीत ‘कमल निवासा’त विराजमान झाले. सत्तेचा तीळगूळ सगळय़ांनाच हवा असतो, पण भाजपने आपली कवळी सांभाळून असे राजकारण करावे. मित्र म्हणून आम्ही त्यांना हे सांगत आहोत. शेवटी काय उंचे लोग उंची पसंद!

भारतीय जनता पक्ष हा अजून तरी आमचा मित्रपक्षच आहे. त्यामुळे आम्ही त्यांना नेहमीच सुयश चिंतीत आलो. उंचे लोग उंची पसंद असे त्यांच्याविषयी म्हटले जात असेलही, पण राजकारणात जो तो आपापले पत्ते पिसत असतो व फेकत असतो. सध्या शिवसेना-भारतीय जनता पक्षात जागावाटपावरून चर्चेच्या फेऱया झडत आहेत. काही लोक या फेऱ्यांना ‘गुऱ्हाळ’ म्हणत असले तरी या गुऱ्हाळातून ‘मळी’ निर्माण होणार नाही तर गुळाचाच गोडवा राहील असे वाटते, पण सत्ताधारी पक्ष असल्यामुळे सध्या अनेक लोक त्यांच्या दारात तीळगुळासाठी उभे आहेत व दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत तीळगूळ भरवण्याचे ‘गोड’ कार्यक्रम सुरू आहेत. भारतीय जनता पक्ष हा साधनशूचिता वगैरे मानणाऱ्यांपैकी असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष, लालू यादवांचा राष्ट्रीय जनता दल, ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस हे पक्ष भ्रष्ट, टाकाऊ, चारित्र्यहीन, गुंडांचे पक्ष म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपने सोडलेली नाही. देशाच्या राजकारणाची गढूळ गंगा कोण शुद्ध करील तर तो भारतीय जनता पक्षच. राजकारणातील गढूळ प्रवाह नष्ट करून शुद्ध चारित्र्याचे, गुंड-झुंड मुक्त असे राजकारण कोण करेल तर तो फक्त सध्याच्या मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच, असे लोकांना वाटत होते.

व्हिडीओ :  पार्टी विथ डिफरन्स की पार्टी विथ 'गुंड'?