मुंबई: मराठवाड्यातला बीअर कारखान्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याला आता शिवसेनेनेही आपला विरोध दर्शवला आहे. पाण्याऐवजी बीअर ढोसायची ही आपली संस्कृती नाही. एकीकडे मराठवाड्यातले जलसाठी सुकत चाललेले असताना सध्या मान्सूनची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.


 

आहे ते पाणी आधी माणसांना जगवण्यासाठी वापरलं पाहिजे. त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते माणसे जगवण्यासाठी वापरणे हाच एकमेव पर्याय आहे व तो सगळ्यांनीच समजून घेतला पाहिजे. अशी भूमिका शिवसेनेने सामना या मुखपत्रातून घेतली आहे.

 

एक नजर सामनाच्या अग्रलेखावर:

 
दार की पाणी?

 

* मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नी सरकारची कोंडी झाली असली तरी यातून मध्यम मार्ग कसा काढावा यासाठी तातडीचे निर्णय घेणे आवश्यक आहे. जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्व जलसाठे सुकले आहेत. मान्सूनची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते माणसे जगवण्यासाठी वापरणे हाच एकमेव पर्याय आहे व तो सगळ्यांनीच समजून घेतला पाहिजे. पाण्याऐवजी बीयर ढोसण्याची आपली संस्कृती नाही. बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवण्याचीही ऐपत दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍याची नाही.

 

* भयंकर दुष्काळ आणि पाण्यासाठी वणवण असल्याने आयपीएल क्रिकेटचे सामने न्यायालयाने महाराष्ट्राबाहेर घालवले आहेत. क्रिकेटच्या मैदानांवर मारण्यासाठी जे पाणी लागते ते आणायचे कुठून? असे उच्च न्यायालयाने विचारले व शंभर कोटींचा महसूल बुडवून हे सामने राज्याबाहेर नेले. पण आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळी दौर्‍यात हॅलिपॅडसाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी केल्याचे प्रकरण समोर आले. ज्या लातुरात सगळ्यात जास्त पाणीटंचाई आहे तिथेच हॅलिपॅड करण्यासाठी पाण्याची नासाडी झाली. अर्थात हॅलिपॅडसाठी वापरलेले पाणी पिण्याचे नव्हते तर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेले पाणी होते, असे मंत्र्यांचे म्हणणे आहे. मग क्रिकेटच्या मैदानावरही जे पाणी हिरवळ राखण्यासाठी वापरले जाणार होते ते तरी कुठे पिण्याचे होते? तरीही सध्या सरकार चालवणार्‍या न्यायालयाने क्रिकेटचे सामने महाराष्ट्राबाहेर घालविले. यातील काही सामने छत्तीसगढ येथील रायपूर येथे आयोजित केले, पण छत्तीसगढ येथील ‘दुष्काळ’ व पाण्याची टंचाई महाराष्ट्रापेक्षा भयंकर असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र तेथील हायकोर्टाने अद्याप तरी पाण्याची नासाडी टाळण्यासाठी रायपूरचे आयपीएल क्रिकेट सामने त्यांच्या राज्याबाहेर हाकलून दिलेले नाहीत.

 

* महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत दुष्काळ व पाण्याचे भयंकर दुर्भिक्ष आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत मोर, काळविटे, हरणे पाण्याशिवाय मरू लागली आहेत. शेतकर्‍यांचे पशुधनही पाण्यासाठी हंबरडे फोडत आहे. काळजाचे पाणी होणेही थांबावे एवढी तेथील पाणीटंचाई भीषण बनली आहे. त्यामुळे मराठवाड्यासारख्या दुष्काळी खाईत असलेल्या भागातील उद्योगांना मिळणार्‍या पाण्याची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीमधील दारूच्या कारखान्यांचे पाणी बंद करून माणसे व पशुधनास द्यावे हे मत आम्ही संभाजीनगर मुक्कामी मांडले. मराठवाड्यात बीयरचे उत्पादन करणारे दहा मोठे कारखाने आहेत. त्यांना मिळणार्‍या पाण्यात वीस टक्के कपात झाली आहे. मराठवाड्यातील उद्योग जगला पाहिजे. कारण हजारो लोकांचा रोजगार व घरातील चुली त्या उद्योगांवर अवलंबून आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्‍नी सरकारची कोंडी झाली असली तरी यातून मध्यम मार्ग कसा काढावा यासाठी तातडीचे निर्णय घेणे आवश्यक आहे.

 

* जायकवाडीसह मराठवाड्यातील सर्व जलसाठे सुकले आहेत. भूगर्भातील पाणी संपले आहे. मान्सूनची प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. त्यामुळे सध्या जे पाणी आहे ते माणसे जगवण्यासाठी वापरणे हाच एकमेव पर्याय आहे व तो सगळ्यांनीच समजून घेतला पाहिजे. पाण्याऐवजी बीयर ढोसण्याची आपली संस्कृती नाही. बाटलीबंद पाणी विकत घेऊन तहान भागवण्याचीही ऐपत दुष्काळात होरपळणार्‍या शेतकर्‍याची नाही. बीयर कंपन्यांना पाणी मिळालेच पाहिजे असा घोषा भाजपच्या मराठवाड्यातील मंत्र्यांनी लावला ही त्यांची भूमिका झाली. आधी माणसे जगवा ही लोकभावना आहे. आज तीच गरज आहे.