मुंबईकर नोकरदारांना सहा दिवस घरचा डब्बा मिळणार नाही!
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2016 06:29 AM (IST)
मुंबई : नोकरदार मुंबईकरांच्या जेवणाचे सहा दिवस हाल होणार आहेत. कारण आजपासून पुढील दिवस डब्बेवाले सुट्टीवर आहेत. त्यामुळे 18 ते 23 एप्रिलदरम्यान सहा दिवस डब्ब्यांची वाहतूक बंद राहणार आहे. मुंबईचे जेवण डब्बे वाहतूक मंडळाने याबाबतची माहिती दिली आहे. पुणे आणि अहमदनगरमधील ग्रामदैवत आणि कुलदैवतांची यात्रा असल्याने डब्बेवाले त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे आजपासून पुढील सहा दिवस मुंबईकरांना घरचा डब्बा मिळणार नाही. मुंबईतील नोकरदारांना घरातील डब्बा पोहोचवण्याचं काम डब्बेवाले करतात. हे डब्बेवाले मूळचे पुणे जिल्हयातील मुळशी, मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर तर अहमदनगर जिल्ह्यातील अकोला, संगमेश्वर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या गावी यात्रा असल्यानेच डब्बेवाले गावाला जाणार आहेत. परिणामी डब्बे वाहतूक सेवा शनिवारपर्यत बंद राहिल. मात्र 25 एप्रिलपासून डब्बेवाले नियमितपणे कामावर रुजू होणार आहे. दरम्यान, डब्बे वाहतूक बंद राहिल्याने ग्राहकांची गैरसोय होणार आहे. परंतु सहा दिवसांच्या सुट्टीचा पगार कापू नये अशी विनंती मुंबईचे जेवण डब्बे वाहतूक मंडळाने केली आहे.