मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात काल बाळा नांदगावकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन मनसेकडून प्रस्तावही दिला होता. मात्र, मनसेबरोबर युती अशक्य असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली आहे. काल नांदगावकर यांनी मनसेचा संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. राज ठाकरे युती करण्यासाठी अनुकूल असून, तुमची इच्छा असल्यास राज ठाकरे आपली भेट घेतील, असा निरोप दिला. शिवाय, मनसेकडून कोणतीही अट असणार नाही, प्रादेशिक अस्मितेसाठी आणि भाजपविरुद्ध मराठी ताकद एकवटण्यासाठी एकत्र यावे, यासाठी मनसे आग्रही असल्याचं कळतं.
बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘मातोश्री’वर अनिल देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर या नेत्यांकडे राज ठाकरेंचा निरोप दिला. त्यानंतर, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन कळवतो, असं शिवसेना नेत्यांनी बाळा नांदगावकरांना सांगितले. मात्र, ‘मातोश्री’कडून अद्याप कोणताही प्रतिसाद मनसेला मिळालेला नाही.
राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावं, अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र त्यासाठी दोघांची इच्छा महत्त्वाची आहे, असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी शनिवारी पुण्यात केलं.
संबंधित बातम्या..तर राज ठाकरे स्वत: 'मातोश्री'वर जाणार?