'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मंत्री आणि सर्व आमदारांची बैठक झाली. मुख्यमंत्री एकट्या नारायण राणेंना भेटतात कसे? राणेंना मराठ्यांचा नेता होऊ देऊ नका, असं म्हणत शिवसेनेच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर नारायण राणेंना भेटणार असतील, तर एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे, अशी मागणी आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली.
दरम्यान, शरद पवारांची भूमिका संशयास्पद आहे, शरद पवार हे मराठ्यांच्या पेटलेल्या आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना आमदारांनी बैठकीत दिली.
राज्यघटनेत छोटीशी दुरुस्ती करुन मराठा, धनगर आणि अन्य समाजालाही आरक्षण मिळू शकतं. संसदेत घटनादुरुस्तीला विरोधकांचा पाठिंबा मिळवून देण्याची जबाबदारी मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे, असं शरद पवार म्हणाले होते.
शिवसेना आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
'मातोश्री'वर झालेल्या बैठकीनंतर शिवसेना मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मराठा समाज विधीमंडळाकडे आशेने पाहतोय. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट न पाहता विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत झाला. याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ सदस्यांनी दिले, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
विधीमंडळात कायदा बनवून संसदेत पाठवण्याची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली. मराठा समाजाचा अंत पाहू नये. त्याचबरोबर धनगर, मुस्लीम आणि अन्य समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने मांडली. कुठल्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे. सचिव आणि तज्ञांना बोलवून चर्चा करू आणि सकारात्मक निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा
मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करता येईल का? राज्यभरात सर्व्हे
मराठा आरक्षण : काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत
मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे