मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं, यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेच्या आमदारांनी विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महामार्गाला बाळासाहेबांचं नाव देण्याची विनंती केली. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद उद्भवण्याची चिन्हं आहेत.


मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणार आहे. शिवसेनाप्रमुखांनी अखंड महाराष्ट्राला जोडण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्राला एकत्र जोडून ठेवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यामुळे या महामार्गाला त्यांचं नाव देण्यात यावं, असं शिवसेना आमदार सुनिल प्रभू म्हणाले.

समृद्धी महामार्गाच्या नामकरणाबाबत भाजपने काय मागणी केली, माहीत नाही. आमचा समृद्धी महामार्गाला विरोध नव्हता. तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत योग्य मोबदला मिळावा, हीच मागणी असल्याचं प्रभूंनी स्पष्ट केलं.

गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक संपल्यावरही मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन दिलं होतं.

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभाग ( विशेष प्रकल्प ) करत असून या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याबाबत शिंदे आग्रही आहेत. समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन लवकरच केलं जाणार असून 87 टक्के जमीन अधिग्रहण पूर्ण झाल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला होता.

माजी महाधिवक्ता श्रीहरी हरे यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यास कडाडून विरोध केला आहे. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल श्रीहरी अणे यांनी विचारला आहे. शिवसेनेच्या एकाही नेत्याने विदर्भातील काहीही केलेलं नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचं नाव समृद्धी महामार्गाला नको, असं श्रीहरी अणे म्हणाले. श्रीहरी अणे यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध केला आहे.

दुसरीकडे, समृद्धी महामार्गाला अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला कोणत्या पक्षाने सुचवलेलं नाव लागणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.