'शिवसेनेच्या आमदारांची नाराजी राहणार नाही'
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2017 11:35 AM (IST)
मुंबई: शिवसेना मंत्री आणि आमदारांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. शिवसेना आमदारांना विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि शेतकरी कर्जमाफी हे मुद्दे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांसमोर मांडले. "शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा आमचा प्रथम क्रमांकाचा विषय आहे. शिवसेना आजही कर्जमुक्तीसाठी आग्रही आहे. जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा लढा सुरु राहील. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात अर्थसंकल्पात आणि फ्लोअरवर आश्वासन दिलं आहे", असं शिवसेने नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिवसेना आमदारांच्या विकासनिधीसंदर्भात समतोल साधला जाईल. ज्या मतदारांनी निवडून दिलं आहे. त्यांची विकासकामं करणं ही माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आमचीही प्रमुख मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. यापुढे शिवसेनेच्या कुठल्याच आमदाराची नाराजी राहाणार नाही, असा प्रयत्न मी करेन असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रामदास कदम मुख्यमंत्र्यांनी आज ठोस आश्वासन दिलं आहे. निधी वाटपाबद्दल कोणावरही अन्याय करणार नाही. हे सरकार शिवसेना आणि भाजपचं सरकार आहे. यापूर्वी भाजपच्या आमदारांना जास्त निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी दिला जात होता. आता यापुढे शिवसेना-भाजपच्या आमदारांना समान निधी वाटप केलं जाईल. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर पूर्ण विश्वास आहे. अर्थसंकल्पात जी नाराजी होती ती आता दूर झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीवर सभागृहात आश्वासन दिलेलं आहे, असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.