बऱ्याच लोकांकडे जुन्या हजार आणि पाचशेच्या नोटा शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे शेवटची संधी म्हणून 31 मार्चपर्यंतची मुदत आहे. मात्र, या नोटा फक्त रिझर्व्ह बँकेतूनच बदलून मिळतात. त्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं आणि नोटा 31 डिसेंबरपूर्वी का बदलल्या नाही याचं कारणही सांगावं लागत आहे.
नोटाबंदीदरम्यान परदेशात असणाऱ्या भारतीयांनाच या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. तर अनिवासी भारतीयांसाठी ही मुदत 30 जूनपर्यंत आहे.
जुन्या नोटा बदलण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कालपासून पैसे बदलण्यासाठी मुंबई आणि नागपूरच्या रिझर्व्ह बँकेच्या समोर मोठी गर्दी पहायला मिळत आहे.
दरम्यान, यासोबतच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आणि बँक खातेदारांना केवायसी अपडेट करण्याची मुदतही आज संपणार आहे. दरम्यान, जर तुम्हाला सोनं विकून अधिकचे पैसे घ्यायचे असतील तर ते आज करता येतील. कारण यापुढे सोने विकून प्रतिदिन १० हजारांपेक्षा जास्त रोख घेण्यावर बंदी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी 30 डिसेंबरपर्यंत बँकांमधून नोटा बदलून मिळतील असं जाहीर केलं होतं. मात्र तरीही नोटा असतील तर त्या प्रतिज्ञापत्रासह रिझर्व्ह बँकेतूनच बदलून मिळणार होत्या. त्यासाठी 31 मार्च ही मुदत होती. ही मुदत उद्या संपणार आहे.