पालघर : शिवसेना आणि भाजपमधला वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. कारण, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


पालघरमधील रानशेत भागात आज शिवसैनिकांनी काही लोकांना पैसे वाटताना रंगेहात पकडलं. त्यावेळी पैसे वाटणाऱ्यानी हे पैसे भाजपने आपल्याला दिल्याची कबुली दिली. भाजपचे शहराध्यक्ष अशोक अंबोरे यांचेच हे पैसे असल्याची कबुली पैसे वाटणाऱ्या तरुणांनी दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून भाजपच्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे अचानकपणे उफाळून आलेल्या या लक्ष्मीदर्शनाच्या प्रकारामुळे शिवसेना-भाजपात मोठा संघर्ष पेटणार आहे.


दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडे एवढा पैसा येतो कुठून, असा सवालही त्यांनी केला. शिवाय पोलिसांना याबाबत कल्पना दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.

संजय राऊत यांनी भाजपच्या दोन आमदारांवर आरोपही केला आहे. हे दोन आमदार हॉटेलमध्ये पैसे घेऊन बसलेले असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपने आरोप फेटाळले

शिवसेनेने केलेले आरोप भाजपने फेटाळले आहेत. हा शिवसेनेचा कट असून प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेकडून अशा नाट्यमय घडामोडी घडवून आणल्या जातात, असं प्रत्युत्तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी दिलं.

पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकाराची सध्या चौकशी सुरु आहे.