Sanjay Raut on Amravati Voilance : अमरावतीतील वातावरण निवळलेलं असताना पुन्हा आगीत तेल ओतू नये, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. रझा अकादमीवर बंदी घालण्यासंदर्भात राज्य सरकार, गृहखातं निर्णय घेईल असंही संजय राऊत म्हणाले आहेत. 


शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "कायदेशीर कारवाई करताना गट, तट, पक्ष पाहिला जात नाही. एकेकाळी विरोधी पक्षनेतेही राज्याचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रात अमरावतीसारख्या घटना घडू नयेत, यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी आगीत तेल न टाकता, ते शांत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अमरावतीसारख्या घटनांचं राजकारण, पेटवापेटवी ही महाराष्ट्राला परवडणारी नाही. महाराष्ट्र हा दंगलींसाठी ओळखला जाऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. आपण पाहिलं असेल त्याच अमरावतीच्या बाजूला पुढे विदर्भात, गडचिरोलीत, याच पोलिसांनी, याच सरकारनं 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. कायद्यापुढं सगळे समान आहेत. अमरावतीत दंगल कोणी पेटवली? कोणत्या कारणानं पेटवली? हे देशालाही माहीती आहे, राज्याच्या गृहमंत्र्यांनाही माहीत आहे आणि अमरावतीच्या जनतेलाही माहीत आहे. वातावरण सगळं शांत झालं असताना, उगाचंचं काड्या करणारं काम कोणीही करु नये, एवढंच मी त्यांना आमच्या पक्षातर्फे आणि महाविकास आघाडीतर्फे आवाहन करिन."


"इंटलिजंस कधी-कधी फेल होतं. शेवटी ती माणसचं आहेत. देशभरात अनेक घटनांच्या संदर्भात इंटलिजेंस फेल होतं. काश्मीरमध्ये होतं, त्रिपुरामध्ये होतं. तरिसुद्ध दंगल राज्याची, अमरावतीची दंगल नियंत्रणात आणली. आज अमरावतीत शांतता नांदतेय, हे महत्त्वाचं." , असं  संयज राऊत म्हणाले.


अजूनही भाजप अमरावतीच्या बाबतीत आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं असं विचारल्यावर, ते आक्रमक आहेत, म्हणजे, त्यांना काय परत दंगल करायची आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. "कशाकरता आंदोलन करत आहेत, काय आहे? महागाई विरोधात आंदोलन करतायत? की, चीन लडाखमध्ये घुसल्यामुळे आंदोलन करत आहेत. कशासाठी आंदोलन करत आहेत, त्यांनी सांगावं.", असंही संजय राऊत म्हणाले. 


हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घाला, असं भाजपच्या वतीनं सांगण्यात येत आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "तुम्ही का नाही घातली बंदी? तुमच्या काळातही काही प्रकार घडले होते. राज्य सरकार कायद्याच्या संदर्भात कुठेही नमतं घेत नाही. काय करायचं आहे? ते गृहमंत्री पाहण्यास सक्षम आहेत." पुढे बोलताना ते म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होणं, म्हणजे, हिंदूंवर गुन्हे दाखल होत आहेत, असं म्हणणं चुकीचं आहे. जे दंगलखोर आहेत. ज्यांनी अमरावती पेटवली. ज्यांनी जनतेचं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, ते कुणीही असू देत. ते एकाच पक्षाचे आहेत, म्हणजे, ते हिंदू किंवा मुस्लिम आहेत, असं होत नाही."