मुंबई : हिंदुत्वाच्या आडून देश हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) केलाय. मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

  


"आज प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले आहेत. दोन्ही वारशांचे आणि विचारांचे नातू एकत्र आले आहेत. दोन्ही नातू एकत्र आल्यानंतर आता यांना जा तू म्हणून सांगणार आहोत. कारण देश सध्या हुकूमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्वाच्या आडून देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकदा चीनला गेलो होतो. त्यावेळी आम्हाला एक युवक भेटला होता. त्यावेळी ऑलिम्पिक सुरू होणार होते. चांगलं इंग्रजी बोलत आहेस यातून चांगले पैसे मिळतील, तू बीजिंगला जा असे सुचवलं. तर त्यावर तो युवक म्हणाला की, मला जगायचं आहे. त्यावेळी मी त्याला म्हणजे काय करायचं आहे असं विचारलं. तर त्यावेळी त्याने सांगितलं की, बीजिंगमध्ये सरकारच्या विरोधात एखादा बोलला तर दोन दिवसांत तो माणूस गायब होतो. सध्या भारतात देखील अशी परिस्थिती सुरू आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.  
 


Uddhav Thackeray : भाजपला टोला


"मला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भेटले त्यावेळी ते थोडे काळजीत वाटत होते. ते मला म्हणाले की, मी भाजपात जात आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरावर आज एफबीआयने छापा टाकला आणि काही कागदपत्र जप्त केली. मग येथील काही लोकांनी लगेच सांगितले तुम्ही भाजपात या तुम्हाला शांत झोप लागेल. त्यामुळे ते उद्या भाजपात किंवा मिंदे गटात गेले तर आश्चर्य वाटायला नको, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.


दरम्यान, आज विधानभवनात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याने हे तैलचित्र काढले आहे त्याचा अपमान करायचा नाही. परंतु, तैलचित्र साकारण्यासाठी कलाकारांना वेळ दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. दुसऱ्यांचे वडील चोरता चोरता स्वत:चे वडील कोण ते लक्षात ठेवा असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचंच कौतुक करत आहेत. मी त्यांच्याकडून मार्गदर्श घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा प्रश्न यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला.   


दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यावेळी त्यांनी काही कामांचं उद्धघाटन केलं. परंतु, आम्ही सुरू केलेल्याच कामांच उद्घाटन त्यांनी केलं. पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्री ही कामं सुरू झाली नाहीत. गेले तीन वर्षे आम्ही ही कामं करत होतो म्हणून तुम्ही आता त्याचं उद्घाटन करून गेले, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. 


महत्वाच्या बातम्या 


Sanjay Raut on Eknath Shinde: संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंच्या दावोसमधील 'त्या' भेटीची खिल्ली; म्हणाले, ष्णमुखानंदबाहेर मला 'या' देशाचे पंतप्रधान भेटले...!