Sanjay Raut Bail : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मुंबईतल्या पत्राचाळ मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी (Patra Chawal Scam) अटक करण्यात आली आहे. ईडीकडून (ED) संजय राऊतांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. अशातच संजय राऊतांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयाच्या (Mumbai Sessions Court) विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला होता. अशातच संजय राऊतांच्या जामीन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. 


राऊतांच्या जामीनावर ईडीला उत्तर देण्याचे निर्देश 


मनी लॉंड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांनी हा अर्ज दाखल केला आहे. यावर आज सुनावणी होण्याची शक्यता होती. पण आता संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नाही. मुंबई सत्र न्यायालयानं ईडीला संजय राऊतांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 


ईडीनं खासदार संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक  केली आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना मुंबई सत्र न्यायालयानं 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीनं कोठडी सुनावली आहे. तर ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयानं 16 सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तसेच, याच दिवशी राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. 


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना ईडीकडून अटक 


कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती. त्यानंतर पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयानं त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 


पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं काय? 


मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (MHADA) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत (Pravin Raut) यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळीचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.