निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
'दानवे पदावर राहणं विरोधकांच्या फायद्याचं', शरद पवारांचा खोचक टोला
एबीपी माझा वेब टीम | 11 May 2017 04:11 PM (IST)
मुंबई: ‘रावसाहेब दानवे पदावर राहणं हे विरोधकांच्या फायद्याचं, त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता?’ अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका सुरु आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. अशावेळी शरद पवारांनी मात्र, विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी करु नये असं म्हटलं आहे. दानवेंच्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा फायदा विरोधी पक्षाला होईल असा टोला शरद पवारांनी हाणला. यावेळी बोलताना पवारांनी कार्यकर्त्यांनाही कानपिचक्या दिल्या. ‘एकीकडे शिवसेना दौरा करत आहे. भाजप निवडणुकीच्या तयारीला लागलं आहे. पण आपण सुखवस्तू झालो आहोत. गेली 15 वर्ष आपण सत्तेत होतो. सरकार जाऊन अडीच वर्ष झाली पण आपली मानसिकता अजून सत्तेत असल्यासारखीच आहे. त्यामुळे ही मानसिकता सर्वात आधी आपल्याला बदलावी लागेल. रस्त्यावर उतरुन संघर्ष केला पाहिजे. लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहे. असं केल्यास नक्कीच वेगळं चित्र पाहायला मिळू शकतो.’ दरम्यान, विरोधकांच्या संघर्ष यात्रेनंतर आता शरद पवार हे राज्यभर दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून होणार आहे.