मुंबई: आमच्या मिशीला कुणाचं खरकटं लागलेलं नाही. आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथं-जिथं चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभीमान दाखवू. शिवाय आमचं चुकलेलं लेकरु परत आणू, असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत भाष्य केलं. ते 'माझा कट्टा' या कार्यक्रमात बोलत होते.


राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, तूर, कर्जमाफी, स्वाभिमानीतील अंतर्गत धुसफूस आणि आत्मक्लेश आंदोलन या सर्वांवर रोखठोक मत मांडलं.

आमचा वाद वैचारिक

माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचं की नाही यावरुन मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत, असं राजू शेट्टी म्हणाले.

सदाभाऊंना शब्द दिला होता...

"आम्ही 2004 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. सदाभाऊ खोत हे 2009 मध्ये आमच्यात सामील झाले. सदाभाऊ जेव्हा भेटले तेव्हा परिस्थितीने हताश झाले होते. मी रस्त्यावर आलोय, पुन्हा चळवळीत आलो तर वरच येणार नाही, असं म्हणत होते. पण मी त्यांना शब्द दिला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल, तोपर्यंत तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यावेळी मी आमदार होतो. जर काही झालंच असतं, निवडणुकी हरलो असतो, तर मला मिळणाऱ्या माजी आमदाराच्या पेन्शनमधून अर्धे सदाभाऊंना देऊ, असं सांगितलं होतं. मात्र ती वेळ आली नाही", असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.

सदाभाऊंनी चळवळीत दिवस काढले. त्यामुळेच मी माझ्यासाठी काहीही न मागता, माझ्या माणसासाठी मंत्रिपद मागितलं. भाजपने 3 विधानपरिषदेच्या जागा देतो असं सांगितलं होतं, मात्र एकच मिळाली. आता उरलेल्या जागा काही मिळणार नाहीत याची खात्री आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.

मोदी सरकारकडून भ्रमनिरास

ज्यावेळी लोकांना आश्वासक चेहरा मिळतो, तेव्हा लोक परिवर्तनासाठी तयार होतात. मोदींच्या आश्वासक चेहऱ्याला लोकांनी पसंती दिली. मात्र मोदी सरकारकडूनही भ्रमनिरास झाला. सरकारनं आमचा अपेक्षाभंग केल्याची खदखद मनात आहेच, असं राजू शेट्टी म्हणाले.

भाजपचं फसवं यश

भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश फसवं आहे, हे यश मृगजळासारख, लोकांना पर्याय नसल्यानं भाजपला बहुमत मिळालं, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं.

महायुतीने अपेक्षाभंग

सरकारमध्ये असूनही आजही आमच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आम्ही एनडीएत राहायचं नाही, याचा पुनर्विचार करु, अजून दोन वर्षं आमच्या हातात आहेत. मोदींनी अपेक्षाभंग केला आहे, दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, असंही राजू शेट्टी म्हणाले.

आत्मक्लेश आंदोलन

येत्या 22 तारखेपासून आमचं आत्मक्लेश आंदोलन सुरु होणार आहे. वाढलेल्या शेतकरी आत्महत्यां हे या आत्मक्लेश आंदोलनाचं मुख्य ध्येय असून, शेतकरी कर्जमुक्ती करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या आमच्या मागण्या आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.