केंद्रात एकाधिकारशाही वाढतेय, शरद पवारांचा घणाघात
एबीपी माझा वेब टीम | 07 Nov 2017 05:58 PM (IST)
कर्जतमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात शरद पवारांनी केंद्र सरकार आणि अप्रत्यक्षपणे मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला.
रायगड : केंद्रात एकाधिकारशाही वाढत चालली आहे. लोकांच्या मुलभूत अधिकारांवर गदा येत आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारची जाहिरातबाजी या मुद्यांवरुनही पवारांनी टोला लगावला. कर्जतमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात शरद पवारांनी केंद्र सरकार आणि अप्रत्यक्षपणे मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. “देशात आणि राज्यात चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे. या देशाच्या जनतेला प्रचंड आश्वासनं दिली गेली होती. प्रधानसेवक म्हणून काम करेल अस चित्र मांडलं गेलं होतं.”, असं म्हणत पवारांनी मोदींवर निशाणा साधला. “महागाई कमी न होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे चुकीचं अर्थकारण. 58 टक्के लोक शेती क्षेत्रात आहेत. मात्र तरी शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण या तीन वर्षात देशात आणि राज्यात वाढलं आहे. अमरावतीमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या. आत्महत्यांचा आलेख वर चालला आहे.”, असे म्हणत पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. रेल्वे सुरक्षेबाबतही पवार आक्रमक 65 लाख लोक लोकल ट्रेनमधून प्रवास करतात. दिवसाला 10 लोकांचा जीव जातो. तितकेच जखमी होतात. काय सुरक्षा आहे?, असा सवाल विचारत पवारांनी रेल्वे सुरक्षेचा मुद्दाही मांडला.