भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात होऊन रक्षाबंधनच्या दिवशीच बहीण-भावाला प्राण गमवावे लागले, तर त्यांचे आई-वडील जखमी झाले आहेत. आसनगावला नातेवाईकांकडे रक्षाबंधन करुन परत येताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.


शहापूर तालुक्यातील अवरे गावात राहणारे प्रकाश बरकू घरत पत्नी आणि दोन मुलांना घेऊन मुंबई-नाशिक महामार्गावरुन बाईकने निघाले होते. महामार्गावर पडलेले खड्डे चुकवताना त्यांची बाईक खड्ड्यात आदळून पडली.

अपघातात घरत दाम्पत्य रस्त्याच्या एका बाजूला पडलं, तर दोन मुलं रस्त्यात पडली. त्याच वेळी मागून येणारी लोडिंग गाडी बाईक आणि मुलांच्या अंगावरुन गेली.

यामध्ये 10 वर्षीय सचिन घरत आणि 15 वर्षीय कामिनी घरत यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती प्रकाश आणि पत्नी रेखा घरत गंभीर जखमी झाले आहेत.

घरत दाम्पत्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बहीण-भावाला चिरडणाऱ्या गाडीचा शोध पोलिस घेत आहेत.