मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत ट्वीट करत उत्तर दिलं आहे.


काय म्हणाले संजय राऊत?
"अन्वय नाईक यांच्याशी 21 व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसलयाचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहारा बाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून!" जय महाराष्ट्र, असे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.




किरीट सोमय्या यांचे आरोप काय आहेत?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


किरीट सोमय्यां यांनी माफी मागावी : शिवसेना
किरीट सोमय्या यांचे आरोप म्हणजे जेवणातील पंगतीत लोणचं वाढल्या सारखे आहे. त्यांच्याकडे फार महत्व द्यावसे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शपथ पत्रात या सगळ्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे यात काही नवीन नाही. ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी द्यावेत. पुढील महिनाभरात आणखीन पूरावे द्यावेत अन्यथा त्यांनी माफी मागावी, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.