कल्याण : 'भाजपनं आमचा मुका घेतला तरी, आता युती होणार नाही,' असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते डोंबिवलीत एका कार्यक्रमानंतर बोलत होते. तसेच, शिवसेना सत्ताधारी नसून फक्त टेकूधारी आहे, आणि राजकीय अस्थिरता टाळण्यासाठी सत्तेत असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.


शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपनं सेनेला गोंजारण्याचे प्रयत्न केले. त्यावर खरमरीत प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आलं.

बलात्कार, जातीयद्वेष यामुळे देशात आणि राज्यात निर्माण झालेलं एकंदरीत वातावरण हे भ्रमनिरास करणारं असल्याचं सांगत; त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवाय, जिथे पक्षाचा स्वाभिमान दुखावला जाईल, ती पदं आपण स्वीकारणार नसल्याचं सांगत त्यांनी राज्यसभा उपसभापतीपदाच्या चर्चेलाही पूर्णविराम दिला.

दरम्यान, विरोधकांचाही त्यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “शिवसेनेनं आवाज उठवल्यावर अजगरासारखा निपचित पडलेला विरोधी पक्ष जागा झाला आहे.” आहे.

दुसरीकडे काल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जावून भेट घेतली.  दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतचा तपशील समोर आलेला नाही. मात्र, राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात इतक्या गुप्त भेटीची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.