मुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीच्या हत्येवरुन राजकारण तापलेलंच आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर शिवसेना आणि काँग्रेसने दुहेरी हल्ला केला आहे. मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवनीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.


सरकारने अवनी वाघिणीला मारण्यासाठी पाच कोटी खर्च केले. मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मुनगंटीवारांना वाघ मारण्यातच जास्त रस असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला.

अवनी वाघिणीच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या ग्लोबल मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा संजय निरुपम यांनी केलीय. हा ग्लोबल मार्च मुंबईतील वरळी सीफेस ते शिवाजी पार्क असा काढण्यात येणार आहे.

अवनीला ज्या पद्धतीने मारलं, त्याचं समर्थन केलं जात आहे, पुरावे नष्ट केले जात आहेत, त्यामुळे मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अवनीची हत्या झाल्यावर एक दिवसाने ओदिशामध्ये एका वाघाला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यात आलं. पाच कोटी रुपये खर्च करुन राज्य सरकारने कुख्यात शूटरला आणून अवनीला मारलं, असंही निरुपम म्हणाले.

2008 ते 2015 दरम्यान महाराष्ट्रात फक्त 14 वाघ मारले गेले. 2016 या एका वर्षात 16 वाघ मारले गेले, तर एकट्या 2017 मध्ये 21 वाघ मारले गेले.  मुनगंटीवार वनमंत्री झाल्यावर वाघ मारण्याची संख्या वाढली. मुनगंटीवर यांचं वर्तन पाहून त्यांना जनावरांना मारण्यात रस आहे, असं वाटतं, असा घणाघातही निरुपम यांनी केला.

सध्या महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये अवैधरित्या शिकारी असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. शिकारी माफिया अॅक्टिव्ह आहेत, शिकारी आणि मंत्र्यांमध्ये साटंलोटं आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. ते मंत्री झाल्यापासून वाघांचा जीव जातोय. त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवायला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी

अवनीची बॉडी असती तर नीट तपास झाला असता, नीट तपासणी झाली नाही. अवनीला जाळून पुरावा नष्ट केला. अवनीची हाडं काढून घेतली का, आपल्याला काही माहीत नाही. मुनगंटीवार जे बोलतात त्यावरुन ते शिकाऱ्यांसोबत काम करतात, असं वाटतं. एक वाघासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात 50 हजार डॉलर मिळतात. या मोठ्या रॅकेटमध्ये मंत्री शामिल आहेत का? या प्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, असंही निरुपम म्हणाले.