मुंबई : कोल्हापूर, सांगली कराडमध्ये पावसाचं थैमान अजूनही सुरुच आहे. परिसरात यंदा पावसाने सर्व विक्रम मोडित काढले आहेत. कोल्हापूर-सांगलीतल्या मुसळधार पावसामुळे सर्व नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. कृष्णा आणि वारणा नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इतकंच नाही तर मुंबई-पुणे-बंगळूरु महामार्गावरील वाहतूकही बंद झाली आहे. याचा फटका आता मुंबईकरांनादेखील बसला आहे.


कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दररोज 13 लाख लीटर दूध दाखल होते. परंतु मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि ठप्प असलेल्या वाहतुकीमुळे कोल्हापुरातल्या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवले आहे. त्यामुळे दररोज मुंबईत येणारे 13 लाख लीटर दूध उद्या मुंबईत येणार नाही. त्यामुळे मुंबईकरांना उद्या दूध मिळणार आहे.

काल रात्रीपासून आज संध्याकाळपर्यंत कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधून एकही दुधाचा टॅंकर नवी मुंबईत दाखल झालेला नाही. कोल्हापूरवरून येणारे गोकुळचे 7-8 लाख लीटर दूध, वारणाचे 3-4 लाख लीटर दूध, त्यासोबतच चितळे आणि इतर कंपन्यांचे 2-3 लाख लीटर दूध मुंबईत आलेले नाही. नवी मुंबईत दूध दाखल झाल्यानंतर या दुधाचा मुंबई, ठाणे, वसई-विरार, पनवेल भागात दूध पुरवठा केला जातो. हा संपूर्ण पुरवठा उद्या थांबणार आहे.

दरम्यान, गोकुळ, वारणा, कृष्णा आणि चितळे या प्रमुख दूध कंपन्यांचे दूध आजही मुंबईत आले नाही. उद्याही दूध मुंबईत पोहोचणार नाही. त्यामुळे मुंबईकरांची उद्याची सकाळी ही चहा, कॉफी आणि दुधाऐवजी जाण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी ज्यांना चहा किंवा कॉफी हवी असते, अशा मुंबईकरांना उद्या कोरा चहा किंवा ब्लॅक कॉफी प्यावी लागणार आहे.