मुंबई: आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले IRS अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे. समीर वानखेडे यांच्या संबंधित सात ठिकाणी सीबीआयने छापेमारी केल्याची माहिती आहे. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे चर्चेत आले होते. आता त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयने दाखल केला आहे. 


सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह इतरांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून त्यांच्या मुंबईतील घराची झडती घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. वानखेडे हे यापूर्वी एनसीबी (NCB) मुंबई झोनचे प्रमुख होते. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेमुळे ते वादात सापडले होते.


आर्यन खान प्रकरण भोवलं


समीर वानखेडेंवर दाखल करण्यात आलेला भ्रष्टाचाराचा गुन्हा हा आर्यन खान प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सीबीआयने पाच जणांवर गुन्हा नोंद केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडे यांच्यासह दोन अधिकारी आणि इतर दोन खासगी व्यक्तींचा समावेश आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती आणि त्यामधील 50 लाख रुपये स्वीकारण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


या प्रकरणात वानखेडे यांच्याशी संबंधित 29 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामध्ये मुंबईसह दिल्ली, कानपूर आणि रांचीतील ठिकाणांचा समावेश आहे. समीर वानखेडे यांचे वडील, बहीण, सासू-सासरे यांच्या घरीही सीबीआयची टीम पोहोचल्याची माहिती आहे. आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सीबीआयने ही रेड टाकल्याची माहिती समोर येत आहे. 


काय आहे आर्यन खान प्रकरण? 


एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता. 


या प्रकरणात पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप नंतर करण्यात आला. प्रसिद्धी आणि पैशासाठी हे सर्व घडवण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. 


आर्यन खान याला नंतर या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली.