मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना काल (13 जानेवारी) अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी आणि समीर खान यांच्या आर्थिक व्यवहार झाल्याचे पुरावे आढळल्याचा दावा एनसीबीने केला आहे. दरम्यान, तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याचे एनसीबीने सांगितले आहे. समीर खान हा करण सजनानी याचा सहकारी असून या दोघांचा मोठा प्लॅन होता, असंही एनसीबीने म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील फॅक्टरीत हर्बलच्या नावाखाली गांजाचे मिश्रण उत्तर प्रदेशातील रामपूर येथे अली नावाच्या व्यक्तीच्या फॅक्टरीत हर्बलच्या नावाखाली गांजाचे मिश्रण केले जात होते. करण आयात केलेल्या बड्स मिसळून त्यांना जॉइंटमध्ये टाकून विकायचा. दरम्यान, रामपूरचा कारखाना मालक अलीचा शोध घेत आहे. परदेशात या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे एनसीबीने म्हटलं आहे. समीर आणि करण यांनी 15 महिन्यांपासून ड्रग्जचा काळा व्यवसाय सुरू केला होता. समीरचे काम ड्रग्जच्या व्यवसायासाठी पैसा पुरवणे होते. या संदर्भात बरेच डिजिटल पुरावे आहेत. ज्यामध्ये चॅट, व्हॉईस नोट आणि कॉल रेकॉर्डिंगही सापडली असल्याचे एनसीबीच्या चौकशीत समोर आले आहे.
नवाब मलिक यांची प्रतिक्रिया दरम्यान जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केल्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणावर ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. त्यात कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कायदा आपलं काम करेल आणि योग्य न्याय होईल. मी कायद्याचा आदर करतो आणि न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे."