मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या आरोपानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.


काय लिहलंय सचिन सावंत यानी?
महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे, त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटीलिया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही, असे सचिन सावंत यांनी म्हटलंय.


जे खंडणीचे आरोप सांगितले जात आहेत ते भाजपाने आधीच कसे केले? सुशांत सिंह राजपूत याची केस पटणा येथे नोंदवली जाऊ शकते तर मोहन देलकर यांची मुंबईत आत्महत्या झाली तिथे का नाही? जीथे गुन्हा घडला तिथेच CRPC प्रमाणे तपास होतो. SMS हे स्वतःला वाचवण्यासाठी दिसत असल्याचेही सावंत म्हणाले.


अगोदर काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत, असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपने मविआ सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे. भाजप नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होत असल्याचाही दावा सावंत यांनी केलाय.


जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती देलकर प्रकरणात का नाही? डेलकर यांनी मोदी शाह यांना पत्र लिहून व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? डेलकर प्रकरणात भाजपचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत असल्याचा आरोप सचिन सांवत यांनी केलाय.






परमबीर सिंह यांचे आरोप काय आहेत?
परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की, "सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारी दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकदा एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल."



अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले
दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, "मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे."