नालासोपाऱ्यात पेटीएमच्या माध्यमातून 32,433 रुपयांची चोरी
एबीपी माझा वेब टीम | 08 Dec 2016 09:10 AM (IST)
वसई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीची घोषणी केली आणि त्यानंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ झाली. चलन तुटवड्याची समस्येनंतर अनेकांना पेटीएम हा कोणत्याही खरेदीसाठी उत्तम पर्याय असल्याचं समजलं. मात्र याच पेटीएमच्या माध्यमातून चोरी झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज येथे राहणारा राजकुमार सोनी या कडीया काम करणाऱ्या व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर चोरी करुन अज्ञाताने पेटीएम खातं उघडलं. या अकाऊंटच्या माध्यमातून राजकुमार सोनी यांच्या बँक खात्यातून 32,433 रुपयांची रक्कम एका दिवसात काढली. सुरुवातीला, 5000, नंतर 16,999 आणि शेवटी 10,434 एवढी रक्कम काढण्यात आली. राजकुमार सोनी यांचा मुलगा सूरज सोनीने बँकेत जाऊन, वेळीच अकाऊंटचं ट्रान्झॅक्शन थांबवलं. नाहीतर आणखी रक्कम गेली असती. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नोटाबंदीनंतर ऑनलाईन ट्रान्झॅक्शनकडे नागरिकांचा कल वाढला. पण काहींच्या अज्ञानाचा फायदा घेत चोरांनी इथेही आपली कर्तबगारी दाखवत पैशांवर डल्ला मारला. मोबाईल रिचार्ज, टॅक्सी-रिक्षा पेमेंट, मेट्रो कार्ड रिचार्ज, सिनेमा तिकीटपासून अगदी चहा आणि भाज्यांच्या खरेदीसाठी लोक पेटीएमला पसंती देत आहेत. मात्र पेटीएमची वाढती मागणी लक्षात घेत, त्याच्या माध्यमातूनही अनेकांना फसवलं जात आहे.