ट्रकखाली येऊन तरुणीचा मृत्यू; खड्डयामुळे अपघात, कुटुंबीयांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम | 14 Oct 2016 09:20 AM (IST)
उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये खैरानी रोडवर अपघातात एक तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, खड्ड्यांमुळे आपल्या मुलीचा बळी गेल्याचा आरोप मिरचंदानी कुटुंबीयांनी केला आहे. नेहा मिरचंदानी ही उल्हासनगरच्या कॅम्प 1 मध्ये राहत होती. काल सकाळी आपल्या वडिलांसोबत अॅक्टिव्हा गाडीवरुन जात असताना एका रिक्षानं त्यांच्या गाडीला धडक दिली. यावेळी गाडी शेजारच्या खड्ड्यात अडकल्यानं मागे बसलेली नेहा गाडीवरुन खाली पडली आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिच्या कुटुंबीयांनी महापालिकेला खड्ड्यांसाठी जबाबदार धरलं आहे. त्यामुळे आता किती जणांचे बळी गेल्यानंतर पालिकेचे डोळे उघडणार असा प्रश्न विचारला जात आहे.