शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र यावं, अशी सर्वांची इच्छा आहे. ते दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल. मात्र त्यासाठी दोघांची इच्छा महत्त्वाची आहे, असं वक्तव्य मनोहर जोशी यांनी शनिवारी पुण्यात केलं आहे. नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधव सोशल अॅण्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आयोजित दुसऱ्या युवा संसदेच्या उद्घाटनापूर्वी जोशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र यासाठी त्या दोघांची इच्छा असणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी मध्यस्थी करणार नाही. दोघे एकत्र आले तर यश अधिक जवळ येईल, राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल, असा विश्वास मनोहर जोशींना वाटतो. युतीत पंचवीस वर्ष सडली या उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत असल्याचंही जोशींनी सांगितलं.
शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचे ध्येयवाद एक असताना वेगळे झाल्यावर नुकसान होते. मात्र युती तुटल्याने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. या निर्णयामुळे शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण असून त्याचा नक्कीच फायदा होईल, अशी खात्री मनोहर जोशींनी व्यक्त केली. मी ज्योतिषी नसलो तरी जोशी म्हणून सांगतो, मुंबई महापालिका निवडणुकीत एकटी शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं.
शिकलेली, हुशार व्यक्ती मंत्री व्हायला हवा. निर्णय घेण्याची कुवत नसणारी माणसं मंत्री होत असल्याने निर्णय चुकत आहेत. मंत्रिपद देण्याची जबाबदारी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि संबंधित पक्षाची असते. सोयीनुसार मंत्री नेमण्यापेक्षा देश पुढे नेतील अशा व्यक्तींनाच मंत्रिपद द्यावे, असंही जोशी म्हणाले.
मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत
शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. याबाबत संजय राऊत म्हणाले की, “मनसेकडून प्रस्ताव आला की नाही याची मला कल्पना नाही. पण जर प्रस्ताव आला असेल तर उद्धव ठाकरे त्यावर निर्णय घेतील.”
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती तुटल्याची घोषणा करत, महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं. त्यानंतर मनसेने शिवसेनेकडे युतीसाठी हात पुढे केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मनसेने शिवसेनेसमोर जागांसाठी कुठलीही अट ठेवली नाही.