मुंबई : रिपब्लिक टिव्हीच्या तीन पत्रकारांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या खालापूर तालुक्यातील भिलवले येथील फार्महाऊसमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अनुज कुमार, जसपाल सिंह, प्रदीप धनवडे अशी या तिघांची नावं आहेत. तिघांनाही अटक करुन कोर्टात हजर केलं गेलं.  कोर्टानं त्यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


या तिघांनी पहिल्यांदा या परिसरात इम्तियाज खत्रीचा बंगला कुठं आहे विचारलं. त्यानंतर एका व्यक्तिला मुख्यमंत्र्यांचा बंगला कुठंय असं विचारलं त्यावर त्या व्यक्तिने माहित नाही असं सांगितलं. त्यानंतर हे तिघे पत्रकार तिथून निघून गेले. नंतर पुन्हा तिथं आले तर तो व्यक्ती बंगल्यात दिसला. त्यावेळी खोटं का बोलला म्हणून या तिघा पत्रकारांनी त्या कर्मचाऱ्याला शिविगाळ करत मारहाण केली आणि तिथून पळून गेले. नंतर त्या कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती दिली गेली आणि नाकाबंदी लावून या तिघांना खानापूर हद्दीत पकडलं गेलं. विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.


खालापुर तालुक्यातील भिलवले येथील फार्महाऊस येथील ही घटना आहे. सुरुवातीला हे पत्रकार होते की नाही याबाबत शंका होती. नाकाबंदी करुन त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ते पत्रकार असल्याचं समोर आलं, अशी माहिती मिळाली आहे.

विनापरवानगी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात शिरण्याचा प्रयत्न केल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.  मंगळवारी सध्यांकाळी 7.30 च्या दरम्यान टुरीस्ट कारने आलेल्या तीन व्यक्तींना चौकशी केली. फार्महाऊस वरील सुरक्षारक्षकांनी गाडी नंबर मुंबई पोलीसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. दरम्यान, खालापूर  व फार्महाऊसवर पोलीसांची कुमक व दंगल नियत्रंण पथकाचा बंदोबस्त वाढविला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून काल हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला. तसेच अर्णब गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा आरोप करत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना आमदार सभागृहात आक्रमक झाले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तसेच इतर नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला. त्यांचं हे वागणं हेतुपुरस्सर आणि आक्षेपार्ह असून अर्णब गोस्वामी यांच्यावर विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात आला. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव मांडला. तसेच या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.


पाहा व्हिडीओ : 'रिपब्लिक'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस


अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलतायत : प्रताप सरनाईक

'अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात या नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची 'रिपब्लिक टीव्ही' ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी.' , अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सभागृहात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना केली.


'अर्णब गोस्वामी स्वतःला सध्या न्यायाधीश समजत असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि त्यांच्यासह इतर मंत्र्यांचा एकेरी उल्लेख करतायत.', असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर टिका केली. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?', असा प्रश्न परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यावेळी सभागृहात गदारोळ झाला आणि सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं.


दरम्यान, सोमवारपासून विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड, 'पायगुणा'वरुन दरेकरांचा पवारांना टोला


आधी प्रवेशावरुन गोंधळ, मग विधेयकावरुन विरोधकांचा सभात्याग; विधीमंडळ अधिवेशनाची वादळी सुरुवात