मुंबई : मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली आहे. या मागणीसाठी लवकरच रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.


रिपाइं मागील दहा वर्षांपासून मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं, अशी मागणी करत आहे. मुंबई ही डॉ. आंबेडकरांची कर्मभूमी होती. प्रदीर्घ काळ त्यांचं मुंबईत वास्तव्य होतं. मुंबईतूनच त्यांनी मानवमुक्तीचा लढा लढवला. मुंबईत त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल या महत्त्वाच्या टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं अशी आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचं रामदास आठवले म्हणाले.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिली आहे. तसंच मध्य रेल्वेच्या व्हिटी (व्हिक्टोरिया टर्मिनस) चं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अस नामांतर करण्यात आलं आहे. त्या नामांतराचं आंबेडकरी जनतेने स्वागत केले असून, आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मध्ये रेल्वे टर्मिनसला दिल्याबद्दल अभिमान वाटत आहे, असंही आठवले यांनी म्हटलं आहे.