मुंबई : रेल्वे मंत्रालय आणि एसआरए एक ज्वाईंट व्हेन्चर कंपनी करुन मुंबईतली रेल्वेलगतच्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणार आहेत. मुंबईत आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव यांच्या बैठकीत या निर्णयाला तत्वतः मान्यता दिली.


मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावर 37.25 हेक्टर तर पश्चिम मार्गावर तब्बल 41.2 हेक्टर जागेवर झोपड्या वसल्या आहेत. त्यामुळे रेल्वेचे नवे प्रकल्प राबवताना अनेक अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आज सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

या बैठकीत मुंबईतील रेल्वेलगतच्या झोपडपट्टींधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी रेल्वे आणि एसआरए ज्वाईंट व्हेंन्चर कंपनी स्थापन करणार आहेत. यासाठी रेल्वेकडून तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे मार्गालगतची झोपडपट्टी हटवून रेल्वेचे प्रकल्प सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, या बैठकीत इतर अनेक महत्वपूर्ण निर्णयही घेतले गेले. यामध्ये बेलापूर-सीवूड्स-उरण मार्ग, एमयूटीपी-2 योजनेतंर्गत वांद्रे ते बोरीवली हा मार्ग 2018 पर्यंत पूर्ण करणार असल्याचं प्रभूंनी सांगितलं. तसेच एमयूटीपी-3 आणि यापुढच्या सर्व रेल्वेचे कोच हे एसी आणि दरवाजे हे स्वयंचलित असतील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.