मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रवासी विमान सेवेबाबत  ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरळीत झाल्यास ऐन गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. 


मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. 


चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे.  


या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे याची भेट चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवे संदर्भात दिल्ली येथे भेट घेतली.  त्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात पालकमंत्री चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली. 


या दोन विमान कंपन्यांनी सेवा 


येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरुळित सुरु करण्याची विनंती पालकमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत केली. त्यानुसार येत्या 1 सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सकारात्मकरित्या सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलांयन्स व इंडीगो या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.
 
चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती व त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन केल्याची माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या विषयामध्ये प्रयत्न केल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले. 


आयआरबीने विमान प्राधिकारणाकडून करावयाच्या ज्या आवश्यक पूर्तता  येत्या चार दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची अशी ग्वाही आयआरबीच्या वतीने विरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी व एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: