Coronavirus | कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी रामदास आठवलेंकडून मदत, गरजूंच्या जेवणाचीही सोय
एबीपी माझा वेब टीम | 31 Mar 2020 01:29 PM (IST)
कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी देशातील राजकीय नेत्यांनीही आपापलं एक महिन्याचं वेतन सरकारला मदत म्हणून दिलं आहे. यामध्ये रामदास आठवले यांचाही समावेश आहे. आठवले यांनी पीएम केअर्स फंडमध्ये एक कोटी रुपये दिले आहेत.
मुंबई : कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी उद्योजक, राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते, सामन्य नागरिक केंद्र आणि राज्य सरकारला मदतीचा हात देत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं योगदान दिलं आहे. रामदास आठवले यांनी पीएम केअर्स फंडमध्ये एक कोटी रुपये दिले आहेत. तर महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दोन महिन्यांचं वेतन दिलं आहे. याशिवाय 14 एप्रिलपर्यंत आपल्या निवासस्थानी गरजूंना मोफत जेवणाचीही सोय केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटाशी लढण्यासाठी सरकारपासून आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टरांपासून आरोग्य कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. तर लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पोलीस उन्हातान्हात उभे आहेत. त्याचत देशातील राजकीय नेत्यांनीही आपापलं एक महिन्याचं वेतन सरकारला मदत म्हणून दिलं आहे. यामध्ये रामदास आठवले यांचाही समावेश आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोनाच्या लढ्याला मदत करण्यासाठी पीएम केयर फंडात माझ्या खासदार निधीतून 1 कोटी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री फंडात माझ्या दोन महिन्याचे वेतन देण्याचा आज निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अनेक गरीब, मजुरांच्या खाण्यापिण्याचे हाल होत आहे. परिणामी अनेकांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. अशा हातावर पोट असणाऱ्यांच्या जेवणाची सोयही रामदास आठवले यांनी आपल्या निवासस्थानी केली आहे. ठाकरे सरकारला सल्ला विरोधी पक्षात असलो तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सरकारसोबत आहोत, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसंच सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्लाही उद्धव ठाकरेंना दिला. ते म्हणाले की, "तसंच कोरोनासारख्या महासंकटाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक आयोजित करुन सर्वांना विश्वासात घ्यावे, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. आम्ही राज्यात सत्तेत नसलो विरोधी पक्ष असलो तरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही सर्व एकजुटीने सरकारसोबत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. गो कोरोना गो.... कोरोनाचं वाढतं संकट दूर व्हावं यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काही परदेशातील प्रतिनिधींसह कोरोना व्हायरसच्या विरोधात 'गो कोरोनो गो' अशा घोषणा दिल्या होता. त्यांना घोषणा देताना पाहून परदेशी नागरिकांनीही या घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणा प्रचंड गाजल्या होत्या. त्यांच्या घोषणांचे मीम्सही बनले होते. शिवाय खिल्लीही उडवण्यात आली होती. Coronavirus Outbreak | गो कोरोना गो! रामदास आठवले यांची कोरोना विरोधात घोषणाबाजी