Jaipur Express Firing : मुंबईलगतच्या पालघर (Palghar) जिल्ह्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदाराने गोळीबार केला. यामध्ये आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. जयपूर एक्सप्रेसच्या एकूण तीन डब्यांमध्ये गोळीबार झाला. B5, S6 आणि पँट्री कारमध्ये आरपीएफचा हवालदार चेतन सिंहने गोळीबार केला. चेतनने या प्रवाशांना शोधून गोळ्या झाडल्याची शक्यता आहे. टिकाराम मीणा (एएसआय, आरपीएफ), अब्दुल कादर मोहम्मदहुसेन भानपुरावाला, रा. नालासोपारा, वय 50 वर्षे (प्रवासी), अख्तर अब्बास अली, रा. शिवडी. वय 48 वर्षे (प्रवासी) अशी मृतांची नावं आहेत.


आरोपी जीआरपीच्या ताब्यात


पहाटे पाच वाजून 23 मिनिटांनी वापी आणि मीरा रोडदरम्यान ही घटना घडली. आरोपीने फायरिंग केल्यानंतर गाडीचे चेन खेचून थांबवली अन् पळून जात होता. मग शेजारीच कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी त्याला पकडले. आरोपी चेतन सिंह सध्या जीआरपीच्या ताब्यात आहे. बोरीवली स्थानकातील आरपीएफ पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी सुरु आहे. तर चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तर संबंधित ट्रेन यार्डमध्ये असून फॉरेन्सिक विभागाचं पथक ट्रेनमध्ये आहे.


वाद झाल्याने प्रवाशांवर गोळीबार


जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस वापी स्थानकाजवळ असताना हवालदार चेतन सिंह आणि काही प्रवाशांमध्ये वाद झाला. यामध्ये चेतनला इतरा राग आला की त्याने प्रवाशांवर बंदूक उगारली. हे पाहून आरपीएफचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टीकाराम मीणा यांनी चेतनला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेतन काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता आणि त्याने त्याच्या वरिष्ठांसह प्रवाशांवरही गोळीबार केला, ज्यामध्ये चारही जणांचा जागीच मृत्यू झाला.


मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई


पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई) नीरज कुमार यांच्या माहितीनुसार, "सकाळी सहाच्या सुमारास आम्हाला समजलं की एस्कॉर्टिंग ड्युटीवर तैनात असलेल्या एका आरपीएफ हवालदाराने गोळीबार केला. गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला, आमचे रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतांच्या कुटुंबियांशी संपर्क केला असून त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल."






संबंधित बातमी