मुंबई : जम्मू काश्मीरमधील पुलवामाच्या अवंतीपुरा सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत. भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी देशभरातून होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचादेखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे की, "आपण सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे."


जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली गाडी आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. त्यानंतर दहशदवाद्यांनी जवानांवर गोळीबारही केला. या हल्ल्यात 39 जवान शहीद झाले आहेत.

या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. अनेक नेते, सेलेब्रिटी आणि सामान्य जनतेने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील ट्वीट करुन या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. तसेच हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी दोन ट्वीट केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, "पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात सीआरपीएफचे जवान शहिद झाले. या शहिदांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून या हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ आहे." राज यांनी या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत त्यांना आवाहन केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या श्रीनगर दौऱ्यावर जाणार आहेत.




संबधित बातम्या

Pulwama terror attack : आदिल अहमद दार, आजच्या हल्ल्याचा क्रूरकर्मा!

Pulwama terror attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांची नावं

Pulwama terror attack : बॉलिवूडकरांनीही व्यक्त केला संताप

भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देण्याची हीच वेळ, राज ठाकरेंचे मोदींना आवाहन

जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही : नरेंद्र मोदी

शहीद जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार : माजी लष्करप्रमुखांचा इशारा

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 39 जवान शहीद

VIDEO | पुलवामात दहशतवादी हल्ला झाल्यानंतरची विदारक दृश्यं