मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, असं म्हणत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा तर केला पण त्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. पोलिसांनीही संजय राठोड यांना हे प्रश्न विचारलेले नाहीत. त्यामुळे आम्ही विचारत आहोत महत्त्वाचे दहा प्रश्न.


1. पूजाच्या मृत्यूप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल का नाही?
हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं कारण आहे. मृत्यूनंतर झालेल्या घडामोडी. पूजा चव्हाण हिचा मृत्यू झाल्यानंतर वानवडी पोलिसांनी नक्की काय तपास केला? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण घटना घडून 11 दिवस लोटल्यानंतरही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आणि त्याला कारण दिलंय कायदेशीर अडचणी. केवळ आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पण गुन्हा दाखल करण्यात अशा कोणत्या कायदेशीर अडचणी आल्या आहेत, हे मात्र समजू शकलेलं नाही.


2. कुठे आहे अरुण राठोड आणि विलास चव्हाण?
पूजा चव्हाण प्रकरणात दुसरा सवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ज्या दोन तरुणांसोबत पूजा वानवडीतल्या फ्लॅटवर राहात होती त्या दोघांची थांगपत्ता कुणालाच नाही. पोलिसांनी या दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. पण त्यांनी नक्की काय जबाब दिला आहे, ते मात्र समोर आलेलं नाही. पण मुख्य मुद्दा असा की अरुण राठोड आणि विलास चव्हाम हे मीडियापासून दूर का आहेत? की त्यांना जाणूनबूजून वेगळं ठेवलं जातंय?


3. पूजा राठोड हीच पूजा चव्हाण आहे का?
पूजाच्या आत्महत्येनंतर दहाव्या दिवशी यवतमाळमधून महत्त्वाची माहिती समोर आली. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात पूजा अरुण राठोड या महिलेची कागदपत्रं समोर आली आहेत. पूजा अरुण राठोड नावाच्या महिलेचा गर्भपात झाल्याचा रिपोर्ट आला आहे. ही महिला नक्की कोण आहे हे अद्याप कळलेलं नाही. 6 फेब्रुवारीला पूजा अरुण राठोड नावाने कागदपत्र समोर आली आहेत. त्यामुळे प्रश्न हा आहे की पूजा चव्हाण हीच पूजा राठोड आहे का? या रिपोर्टवर इंग्रजीत ड्राफ्ट कॉपी असं लिहिलं असून त्या खाली शॉर्ट केस रेकॉर्ड असं लिहिलं आहे. त्यामुळे ही पूजा राठोडहीच पूजा चव्हाण असल्याचा संशय बळवला आहे.


4. पूजाच्या कुटुंबावर कोणता दबाव आहे का?
पूजाच्या मृत्यूच्या तब्बल 7 दिवसांनी तिचे वडील माध्यमांसमोर आले आणि त्यांनी पूजाचा मृत्यू हा आर्थिक विवंचनेतून झाल्याचं सांगितलं. तिचा संजय राठोड किंवा अरुण राठोड यांच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. इतकंच नाही तर पूजाच्या मृत्यूमध्ये घातपाताची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आपसूकच प्रश्न पडतो की पूजाच्या कुटुंबावर कुणाचा दबाव आहे का?


5. पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा तपशील का नाही?
पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टकडे सर्वाचं लक्ष होतं. 13 फेब्रुवारीला तिचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला. त्यामध्ये डोक्‍याला आणि मणक्‍याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केले होतं. घटना घडली, त्या रात्री पूजाने मद्यप्राशन केलं होतं, असा उल्लेख जबाबात होता. मात्र पोस्टमॉर्टेममध्ये त्याचा खुलासा का केला नाही?


6. ऑडिओ क्लिप्सची तपासणी का नाही?
पूजाचा मृत्यू झाला आणि सोशल मीडियात अनेक ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. सोशल मीडियात फिरत असलेल्या ऑडिओ क्लिप खऱ्या आहेत की बनावट आहेत? याबाबत अजूनही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या क्लिपद्वारे मृत तरुणी आणि एका मंत्र्याचं नाव जोडलं जातं आहे. शिवाय या क्लिपमधली तिसरी व्यक्ती ही अरुण राठोड असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे या क्लिपची सत्य-असत्यता पडताळणं जास्त गरजेचं आहे.


7. अरुण राठोड वनविभागात कसा लागला?
अरुण राठोड हा मूळचा परळीचा आहे. दारावती तांडामध्ये त्याचं घर आहे. अग्निशमन दलात नोकरी करण्याची त्याची इच्छा होती. म्हणूनच त्याने अग्निशामक दलाचा कोर्स सुद्धा केला होता. अरुण पुण्यात अभ्यास करण्यासाठी गेला होता अस त्यांच्या नातेवाईकांचा दावा आहे. मात्र, असं असलं तरी हा अरुण राठोड वनविभागात कामाला लागला. अग्निशमनचं स्वप्न सोडून अरुण राठोड वनविभागात कसा पोहोचला आणि त्याला कोणत्याही परीक्षेविना वनविभागात नोकरी कशी मिळाली हा ही संशोधनाचा विषय आहे.


8. पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल कुठे आहे?
हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पूजाच्या लॅपटॉप आणि मोबाईलबद्दल कुणाला काहीही माहिती नाही. पूजाच्या मृत्यूनंतर तिचा मोबाईल आणि लॅपटॉप हे तपासामध्ये सर्वात महत्त्वाचा दुवा ठरले असते. पण तपास करण्यासाठी तो दुवाच पोलिसांकडे आहे की नाही याची माहिती नाही. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये तो मोबाईल मिळवण्यासाठी कथित मंत्री आटापिटा करत असल्याचं समोर आलं होतं.


9. अरुण राठोडच्या घरी चोरी कशी झाली?
आधी पूजा चव्हाणचा मृत्यू होतो, मग तिचा लॅपटॉप गायब होतो. मग तिच्यासोबतचे अरुण आणि विलास गायब होतात आणि आता अरुणच्या घरी चोरी होते. पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. पण फक्त चोरीची चौकशी करुन भागणार नाही. या चोरीमागे काही वेगळे उद्देश होते का? याचाही तपास गरजेचा आहे. धारावती तांडा येथील अरुण राठोडच्या घरातून अनेक गोष्टींची चोरी झाली आहे.


10. वानवडीतले प्रत्यक्षदर्शी का बोलत नाहीत?
जेव्हा पूजा अत्यवस्थ अवस्थेत इमारतीखाली पडली होती तेव्हा तिला भाजपच्या स्थानिक नगरसेवकांसह शेजाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण त्या दिवसापासून आजतागायत, प्रत्यक्ष घटनेवेळी काय झालं? कसं झालं? याब्बदल कुणीही बोलत नाही. वानवडीतल्या स्थानिकांचा हा अबोला, संशयामध्ये आणखी भर घालत आहे.


संजय राठोड यांनी या 10 प्रश्नांची उत्तरे देणं गरजेचं आहे. राठोड यांनी देवाच्या दरबारात उभं राहून आपली बाजू तर मांडली पण त्यांनी माध्यमांना प्रश्न विचारण्याची मुभा दिली नाही. त्यामुळे आता पोलिसांची आणि सरकारची जबाबदारी आहे की 'एबीपी माझा'ने विचारलेले प्रश्न संजय राठोड यांना विचारण्याची हिंमत दाखवण्याची.