ठाणे : 2020 या वर्षाला गुड बाय करुन 2021 या नववर्षाचे स्वागत काही तासांवर येऊन ठेपले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलीस अलर्ट झाले असून मद्यपान करणाऱ्यांवर वाहतूक विभागाचे बारीक लक्ष असणार आहे. मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 डिसेंबरपासून कारवाई सुरु केली आहे. पहिल्या चार दिवसांत विविध ठिकाणी केलेल्या नाकाबंदीमध्ये सुमारे 415 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई झाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चेकपोस्ट उभारुन प्रत्येक वाहनचालकाची तपासणी केली जाणार आहे. मोटार वाहन कायद्यान्वये केवळ मद्यपी वाहनचालकच नव्हे तर, वाहनांतील सहप्रवासीसुद्धा दोषी ठरतात. यंदा त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुणीही मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


कोरोना संक्रमणाचा धोका कायम असल्याने गेल्या आठ महिन्यांपासून वाहतूक पोलिस मद्यपी वाहनचालकांच्या विरोधात कारवाई करत नव्हते. ब्रेथ एनलायजरच्या सहाय्याने तपासणी शक्य नसल्याने मद्यपी वाहनचालकांचा बेदरकारपणा वाढू लागला आहे. रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत त्यामुळे वाढ होण्याचा धोका आहे. 5 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू असल्याने हॉटेल, बार आणि अन्य ठिकाणी रात्री 11 नंतर पार्ट्यांवर बंदी आहे. परंतु, अनेकजण आपापल्या घरांमध्ये किंवा खासगी ठिकाणांवर पार्टी केल्यानंतर नववर्ष स्वागताचा जल्लोष करण्यासाठी बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहेत. त्यानुसार वाहतूक पोलिसांची मद्यपी वाहनचालकांविरोधातील कारवाई तीव्र करण्यासाठी विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.


मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 अन्वये मद्यपी वाहनचालकांना दोन हजार रुपये दंड किंवा सहा महिने कैद अशी शिक्षा होऊ शकते. हा गुन्हा पुन्हा-पुन्हा केल्यास तीन हजार रुपये दंड आणि दोन वर्षे कारावास अशा शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. तसेच, याच कायद्याच्या कलम 188 मध्ये मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीला वाहन चालवण्यास उद्युक्त केल्याचा ठपका ठेवत सहप्रवाशांवरही कारवाई होऊ शकते. त्या कलमाचा आधार यंदा पोलीस घेणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये किंवा मद्यपी वाहनचालकासोबत प्रवास करु नये, असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. रात्री अकरानंतर घराबाहेर पडल्यास संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते. नववर्षात अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी रात्री कुणीही घराबाहेर पडू नये, असेही आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.