मुंबई : आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली. 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली होती.


 

 

विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती,  अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल . शवविच्छदानानंतर शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील राहत्या घरी आणलं जाणार आहे.

 
विलास शिंदेंना केलेल्या मारहाणीचं कारण काय तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्याला थांबवलं आणि लायसन्सची मागणी केली. पण गुंडांच्या मारहाणीत एकट्या विलास शिंदेंचा मृत्यू झाला नाही तर इथली कायदा आणि सुव्यवस्था किती मरणासन्न अवस्थेत आहे, याचं दर्शन घडलं.

 
विलास शिंदेंना मारहाण करणारा आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. पण त्यामुळे विलास शिंदेंचा गेलेला जीव पुन्हा परत येणार नाही. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम टोळक्याला हात लावला जात नाही, असा आरोप करत राज ठाकरेंनी मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे.

 
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून क्राईम रेट कमी झाल्याचा दावा मोठ्या आवेशात करतात. पण थेट वर्दीवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदारानं पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली होती. तर आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकाऱ्याच्या अंगावर हात उचलला होता.

 
अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या गावगुंडांची हिंमत वाढते आणि ते सहज पोलिसांवर हात उचलतात. त्यामुळेच विलास शिंदेंचा बळी गेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीसांनी आकडेमोकड करत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा गांभीर्यानं विचार करावा आणि पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही. अशा कायद्याचा धाक निर्माण करावा. हीच विलास शिंदेंना खरी श्रद्धांजली ठरेल.