मुंबई :मुंबईकरांची सहनशक्ती फार मोठी आहे. म्हणून दरवर्षीप्रमाणे ते यंदाही मॉन्सूनमध्ये ते मुंबई महानगरपालिकेचा निष्काळजीपणा सहन करतील,  अशा शब्दांत हायकोर्टानं पालिका प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. मॉन्सूनदरम्यान मुंबईतील रस्त्यांची चाळण होण्याच्या दरवर्षीच्या समस्येविरोधात दाखल सूमोटो याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे.


वारंवार निर्देश देऊनही पालिका प्रशासनानं मॉन्सून दरम्यानच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर कामं केलेलं नाही, असं त्यांनीच दिलेल्या उत्तरांवरून स्पष्ट होत आहे, असं सांगत लोकांना चांगले रस्ते उपलब्ध करून देणं ही पालिकेची नैतिक जबाबदारी असल्याचंही हायकोर्टानं म्हटलं आहे.


सध्या मॉन्सूनपूर्व काळ सुरू असून लवकरच मॉन्सून दाखल होईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, सांडपाण्याची व्यवस्था, रस्ते यांसारखी महत्त्वाची काम तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे. पालिका प्रशासनाला या सर्व समस्यांची पूर्ण जाणीव आहे. त्यासाठी काय करायला हवं हे देखील त्यांना ठाऊक आहे. मात्र त्यांना हे देखील पक्कं ठाऊक आहे की, मुंबईकरांचा सहन करण्याची ताकदही खूप मोठी आहे. त्यामुळे दरवेळी त्याचा गैरफायदा घेतला जातो.


सध्या अनेक ठिकाणी रस्ते दुरूस्तीची कामं सुरू असून यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबईकरांना फार त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेत असल्याचं यावेळी पालिकेच्यावतीनं हायकोर्टात सांगण्यात आलं. यासंदर्भात पुढील आठवड्यांत होणाऱ्या सुनावणीत पालिकेला सविस्तर उत्तर देण्याचो निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.