मुंबई : सीएसएमटी रेल्वे स्टेशनबाहेरील फुटओव्हर ब्रिजचा स्लॅब कोसळल्याच्या घटनेसंदर्भात शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर झाली आहे.


प्रदीप भालेकर यांच्यावतीनं अॅड. नितीन सातपुते यांनी सादर केलेल्या या याचिकेवर 22 मार्चला सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सादर करण्यात आली. याचसंदर्भात आणखी एक-दोन याचिका दाखल होण्याची शक्यता आहे. गुरुवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागतेत तर 31 जण जखमी झाले आहेत.

साल 2017 मध्ये घडलेल्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. या दुर्दैवी घटनेत 31 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या याचिकेतून शहरातील सर्व धोकादायक पुलांचं 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्यासाठी एका विशिष्ठ समितीच्या स्थापनेची मागणी करण्यात आली होती. तसेच भविष्यात पुल रेल्वेचा की पालिकेचा या वादात न पडता रेल्वे प्रशासन आणि पालिकेनं एकत्रित काम करण्याचं दिलेलं आश्वासन हवेतच विरलं असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.