मुंबई : देशाच्या सुरक्षेसंदर्भात वादग्रस्त विधान केल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवून त्यांची सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, या मागणीसाठी माजी पत्रकार अॅड. एस. बालाकृष्णन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशाच्या सुरक्षेबाबत इतकी गंभीर बाब माहिती होती तर मग राज ठाकरेंनी त्याची रितसर तक्रार का केली नाही? असा सवाल याचिकाकर्त्यांनी विचारला आहे.


मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. मात्र मुंबई उच्च न्यायालयानं यावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. तेव्हा आता जेव्हा तारीख पडेल तेव्हा यावर सुनावणी होईल, मात्र पुढील आठवड्यात दुसऱ्या खंडपीठापुढे पुन्हा याचिका सादर करणार असल्याचं याचिकाकर्त्यांनी एबीपी माझाला सांगितलं आहे.

भविष्यात देशावर मोठा दहशतवादी हल्ला होऊन युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल, या आशयाचं विधान राज ठाकरे यांनी आपल्या एका सभेत केलं होत. त्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला तेव्हा आपण केलेलं भाकित खरं ठरलं असा दावाही राज ठाकरे यांनी केला होता. मात्र ही बाब फार गंभीर असून जर एखाद्या व्यक्तीकडे इतकी संवेदनशील माहिती असेल तर त्यानं ती तातडीनं पोलीसांना देणं आवश्यक आहे. तसं न केल्यानं त्या व्यक्तीची भुमिकाच संशयास्पद होते. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी चेंबूर पोलीस स्थानकात पत्रव्यवहार करून तक्रार केली होती. मात्र त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्यानं याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे.