मुंंबई : देशभरातल्या मोबाईल धारकांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. देशातील अनेकांच्या मोबाईलमध्ये एक नंबर आपोआप सेव्ह झाल्याचं समोर आलं आहे. युनिक आयडेन्टिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचा (UIDAI) मदत क्रमांक अनेकांच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होत आहे. त्यामुळे अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.


UIDAIने मात्र या प्रकरणी हात वर करुन, या क्रमांकाशी आपला संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा एखादा हॅकिंगचा प्रकार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून  एक टोल फ्री नंबर अनेकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह होत असून तो आधारचा असल्याचं सांगितलं जात आहे.


UIDAIने याबाबत ट्विटरवर स्पष्टीकरण देत हा नंबर आपला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. UIDAIने म्हटलं की, "अनेकांच्या मोबाईलमध्ये 1800 300 1947 हा नंबर UIDAI नावाने विनापरवानगी सेव्ह झाला आहे. हा नंबर आधारचा नंबर असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा नंबर UIDAIचा टोल फ्री नंबर नाही. लोकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. आधारचा हेल्पलाईन नंबर '1947' असून तो अद्यापही सुरू आहे. तसेच हा नंबर लोकांच्या फोनमध्ये सेव्ह करण्याचे कोणतेही आदेश आम्ही टेलिकॉम कंपन्यांना दिलेले नाहीत"





"आज सकाळी अनेक मोबाईल युजर्सच्या मोबाईलमध्ये UIDAIचा टोल फ्री नंबर आपोआप सेव्ह झाला आहे. युजरच्या फोनमध्ये mAadhar अॅप इन्स्टॉल नसतानाही हा नंबर सेव्ह झाला आहे. याबाबत तुम्ही(UIDAI) काही सांगू शकता का?" असा प्रश्न सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट मिस्टर रोबोने ट्विटरवर UIDAIला विचारलं होतं.