मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराच्या मुद्द्यावर मुंबई महापालिका आणि बेस्ट यांच्यात झालेल्या बैठकीत तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. थकीत पगार देण्यासाठी 185 कोटीची रक्कम देवून 21 तारखेला 31 हजार कर्मचाऱ्यांना आणि 22 तारखेला 11 कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार. हा सर्व खर्च तुर्तास स्वतः बेस्ट भागवणार आहे. विशेष म्हणजे, हा खर्च बेस्ट कर्ज काढून भागवणार आहे.

महापौरांच्या दालनात झालेल्या या बैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट महाव्यवस्थापक जगदीश पाटील, आयुक्त, सभागृह नेते यशवंत जाधव, बेस्ट समिति अध्यक्ष अनिल कोकीळ उपस्थित होते.

बेस्टच्या ४२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासूनचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर याची लवकरच पुर्तता होईल अशी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आशा होती. पण महापालिका निवडणुक होऊन विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या झाल्या, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांचे थकीत पगाराचे पैसे आले नव्हते.

त्यामुळे बेस्ट कर्मचारी संघटनाचे सरचिटणीस शशांक राव यांनी आक्रमक पवित्र घेत पगार लवकरच नाही मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशार दिला होता. तर दुसरीकडे विरोधकांनीही शिवसेनेला कोंडीत पकडलं होतं.

त्यामुळे अखेर आज महापौर दालनात झालेल्या बैठकीनंतर थकीत पगाराची पुर्तता करण्यासाठी बेस्ट स्वत: 185 कोटीचं कर्ज काढून सर्व कर्मचाऱ्यांचे थकीत पगार भागवणार असल्याचे निश्चित झालं. याशिवाय, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर कायम स्वरूपी पगारावर तोडगा काढण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याचे आदेशही यावेळी महापौरांना दिले आहेत. त्यामुळे गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर बेस्ट कर्मचाऱ्यांना त्यांचा थकीत पगार मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

संबंधित बातम्या

''मुंबई महापालिकेच्या 61 हजार कोटींच्या ठेवींची माहिती सादर करा''

मुंबई महापालिकेचे 61 हजार 510 कोटी रुपये बँकेत जमा!

बेस्ट समिती अध्यक्षांनाच कर्मचाऱ्यांच्या वेदनेचा विसर?

शिवसेनेनं ‘करुन दाखवलं’, बेस्ट कामगाराला बेस्ट समितीचा अध्यक्ष बनवलं !