Mumbai Police Threatenedमुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज केल्याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. 26/11 सारखा हल्ला करण्याची मेसेजवरुन धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी विवारमधून एका संशियत व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरु आहे. एटीएस आणि मुंबई पोलीस याबाबत अधिक तपास करणार आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधील एका क्रमांकावरुन मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आला होता. यामध्ये भारतामधील सहा व्यक्ती आमच्यासोबत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यांचे नंबरही धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला होता. 


पोलिसांनी सर्व क्रमांक ट्रक करण्याचं काम सुरु केलं होतं. यातील बरेच क्रमांक उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लोकेट होत होते. पण एक नंबर विरार येथून ट्रव्हल करत असताना निदर्शनास आले. त्यानंतर लगेच एक स्पेशल पोलीस पथक रवाना झालं अन् त्याला ताब्यात घेण्यात आलं. याबाबत अद्याप पोलीस अथवा एजन्सीकडून माहिती मिळालेली नाही. पण सध्या त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु आहे. तो व्यक्ती कोण आहे? काय काम करतो? त्याचं बॅकग्राऊंड काय? त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचा नंबर पाकिस्तानमध्ये बसलेल्या व्यक्तीला कसा मिळाला? याचा तपास करण्यात येणार आहे. तो व्यक्ती दोषी आढळला तरच त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जर तो दोषी आढळला नाही तर त्याला सोडण्यात येणार आहे. 


पाकिस्तानमधून धमकीचा मेसेज -
एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं धमकीचा मेसेज आलेल्या क्रमांकावर संपर्क केला असता हा मेसेज पाकिस्तानमधून असल्याचं समोर आलं आहे. धमकीचा मेसेज आलेला नंबर वापरणाऱ्या व्यक्तीचं नाव इम्तियाज असे आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे  त्याला अशा कोणत्याही संदेशाची माहिती नाही. कारण तो एक सामान्य फोन वापरत आहे ज्यामध्ये कोणतेही व्हॉट्सअॅप नाही. पण भारतातून कॉल येऊ लागल्याने तो स्वत: डिस्टर्ब असल्याचे त्यानं एबीपीशी बोलताना सांगितलं.  


धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटलेय?
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ट्रॅफिक कंट्रोल रूमच्या whatsapp वर धमकीचा मेसेज आलाय. 26/11 सारखा मुंबईत हल्ला करण्याची धमकी या मेसेजमध्ये देण्यात आली आहे. मेसेज करणाऱ्यानं म्हटलंय की, जर त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला, तर ते भारताबाहेरचं दाखवलं जाईल आणि धमाका मुंबईत होईल. धमकीच्या मेसेजमध्ये म्हटलंय की, भारतात सध्या 6 लोक आहेत, जे हे काम पूर्ण करतील. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यासोबतच दुसऱ्या तपास यंत्रणांनाही याची माहिती दिली आहे.